Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / सीमावर्ती गावे बनत आहेत ‘पहिली गावे’; युवक सक्षमीकरण व सीमासुरक्षा समन्वयावर भर

सीमावर्ती गावे बनत आहेत ‘पहिली गावे’; युवक सक्षमीकरण व सीमासुरक्षा समन्वयावर भर

Raksha Khadse | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


लडाख : केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ‘वायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’ अंतर्गत ११ ते १३ जून २०२६ या कालावधीत लडाखमधील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या सीमावर्ती भागांचा तीन दिवसांचा दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात सीमावर्ती गावांतील विकासकामांचा आढावा घेण्याबरोबरच स्थानिक नागरिक, युवक आणि सुरक्षा दलांशी संवाद साधण्यात आला.

दौऱ्यादरम्यान सीमावर्ती भागातील युवकांना कौशल्य विकास, क्रीडा आणि राष्ट्रीय विकास प्रक्रियेशी जोडण्यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी ‘माय भारत’च्या राज्य संचालक ताजमुल आरा, चांगथांगचे जिल्हाधिकारी नितीश राजोरा, आयटीबीपीचे डीआयजी ताशी नामग्याल, डेप्युटी कमांडंट प्रियंजन यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

११ जून रोजी लेह येथील ‘हॉल ऑफ फेम’ स्मारकाला भेट देऊन रक्षा खडसे यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय सशस्त्र दलांचे शौर्य, शिस्त आणि देशभक्ती ही संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

१२ जून रोजी त्यांनी सीमावर्ती हेम्या गावाला भेट दिली. स्थानिक नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी स्थानिक कलाकार व शाळकरी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून लडाखची समृद्ध संस्कृती आणि परंपरा अनुभवायला मिळाली. ‘वायब्रंट व्हिलेज’ उपक्रमातील युवकांनी विकासाच्या संधी, अपेक्षा आणि स्थानिक समस्यांबाबत आपली मते मांडली.

यानंतर सरपंचांच्या निवासस्थानी झालेल्या संवादात युवकांशी कौशल्य विकास, क्रीडा, रोजगारनिर्मिती आणि गावांच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आयटीबीपी कॅम्पला भेट देऊन त्यांनी जवानांशी संवाद साधला व प्रतिकूल हवामानात देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या हिमवीरांच्या कार्याचे कौतुक केले.

दौऱ्याच्या अंतिम दिवशी १३ जून रोजी प्रसिद्ध थिकसे मठाला भेट देऊन त्यांनी सकाळच्या प्रार्थनेत सहभाग घेतला. देशाच्या शांतता, समृद्धी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करत त्यांनी मठातील भिक्षूंशी संवाद साधला.

दौऱ्याच्या समारोपप्रसंगी रक्षा खडसे म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सीमावर्ती गावे आता ‘शेवटची गावे’ नसून ‘पहिली गावे’ म्हणून विकसित होत आहेत. विकसित भारत २०४७च्या संकल्पपूर्तीसाठी सीमावर्ती भागातील युवकांची ऊर्जा आणि सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.”

केंद्र सरकारचा ‘वायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’ सीमावर्ती गावांमध्ये पायाभूत सुविधा, रोजगार संधी, संपर्क व्यवस्था आणि जीवनमान उंचावण्यासाठी राबविण्यात येत असून या माध्यमातून सीमाभागांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, लडाख


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

Jaspal Rana Death: दिग्गज शूटर और द्रोणाचार्य अवॉर्डी जशपाल राणा का निधन, खेल जगत में शोक की लहर

Jaspal Rana Death: दिग्गज शूटर और द्रोणाचार्य अवॉर्डी जशपाल राणा का निधन, खेल जगत में शोक की लहर

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading