Raksha Khadse | New Delhi | Bureau Report Akash Dhake

नवी दिल्ली | १ फेब्रुवारी २०२६ : केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत सादर केलेल्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी उत्साहात स्वागत केले आहे.
हा अर्थसंकल्प तरुणांच्या स्वप्नांना बळ देणारा असून भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने टाकलेले दूरदृष्टीपूर्ण आणि क्रांतिकारी पाऊल असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अर्थसंकल्पाला समर्थन देताना रक्षा खडसे म्हणाल्या की, देशाचा आर्थिक विकास दर सात टक्क्यांच्या आसपास टिकवून ठेवण्यासाठी हा सक्षम आराखडा असून रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास, पायाभूत सुविधा आणि नवोन्मेषाला एकत्रित चालना देणारा आहे.
‘विकसित भारत यंग लीडर डायलॉग’ला सकारात्मक प्रतिसाद
केंद्रीय राज्यमंत्री या नात्याने ‘विकसित भारत यंग लीडर डायलॉग’ या उपक्रमाला देशभरातून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुणांनी धोरणनिर्मितीत सक्रिय सहभाग नोंदवत भारताच्या भविष्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना मांडल्याचे त्यांनी नमूद केले.
तरुणांच्या हाती नेतृत्व देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असून त्यांच्या ऊर्जेमुळे ‘विकसित भारत २०२७’ चे ध्येय अधिक भक्कम झाल्याचे त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्प २०२६-२७ : ठळक मुद्दे
युवा शक्ती व कौशल्य विकास
पीएम इंटर्नशिप स्कीमसाठी ४,७८८ कोटी रुपये तर स्किल इंडिया योजनेसाठी २,८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे तरुणांना रोजगार आणि प्रशिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध होतील.
ऑरेंज इकॉनॉमी – सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना
कला, संस्कृती, डिझाइन आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला प्रोत्साहन देऊन कलाकार व सर्जनशील स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यावर भर देण्यात आला आहे.
औद्योगिक व तांत्रिक क्रांती
सेमीकंडक्टर मिशन २.० साठी ४०,००० कोटी रुपये, भारताला ग्लोबल बायो-फार्मा हब बनवण्यासाठी १०,००० कोटी रुपये आणि MSME क्षेत्रासाठी १०,००० कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. ग्रामीण कारागिरांसाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रमालाही चालना देण्यात आली आहे.
पायाभूत सुविधा
१२.२ लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक भांडवली खर्च आणि सात नवीन हाय-स्पीड रेल कॉरिडॉरच्या विकासाची घोषणा करण्यात आली आहे.
शेती व शेतकरी कल्याण
कृषी क्षेत्रासाठी १,६२,६७१ कोटी रुपयांची तरतूद, डिजिटल शेतीसाठी अॅग्रीस्टॅक व AI चा वापर आणि मच्छिमारांना शुल्क माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कर सवलत व आरोग्य
परदेशी टूर पॅकेजवरील TCS २० टक्क्यांवरून २ टक्के करण्यात आला आहे. परदेशी शिक्षण व उपचारांवरील करात कपात करण्यात आली असून उत्तर भारतात NIMHANS-II स्थापण्याची घोषणा करण्यात आली आहे. भारताला जागतिक मेडिकल टुरिझम हब बनवण्याचे उद्दिष्टही अधोरेखित करण्यात आले आहे.
समारोप
“हा अर्थसंकल्प वंचित, तरुण आणि मध्यमवर्गीयांच्या आकांक्षा पूर्ण करणारा आहे. ‘विकसित भारत यंग लीडर डायलॉग’मुळे तरुणांना नेतृत्व मिळेल, तर ‘ऑरेंज इकॉनॉमी’मुळे आपल्या संस्कृतीला नवे आर्थिक परिमाण प्राप्त होईल. यामुळे ‘सबका साथ, सबका विकास’ हे स्वप्न साकार होईल,” असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, नवी दिल्ली
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7