मराठी भाषेतील वृत्तपत्रांना ऐतिहासिक वारसा लाभलेला असून समाजाला सर्वांगाने डोळस करण्याचं काम वृत्तपत्रांनी केले असल्याने वृत्तपत्र हे समाज प्रबोधनाचे दीप स्तंभ ठरतात असे प्रतिपादन प्रा. डॉ. जतीन मेढे यांनी यावेळी केले. ते कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथील राज्यशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे होते. याप्रसंगी समाज प्रबोधनाच्या वाटचालीत वृत्तपत्रांची भूमिका या विषयावर मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. मेढे म्हणालेत की, १९२ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मराठी भाषेत बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून वृत्तपत्रीय सेवेचा प्रारंभ केला. त्या पुढील काळात ‘दर्पण’ ची राष्ट्र आणि समाजप्रबोधनाची प्रेरणा घेऊन मराठी भाषेत प्रभाकर, केसरी, मराठा, दीन बंधू, जनता, मूक नायक अशी अनेक वृत्तपत्र निघालित. या सर्वच वृत्तपत्रांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला आणि सामाजिक सुधारणेच्या चळवळीला गती देऊन आपल्या देशाला उन्नत करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे आधुनिक भारताच्या निर्मितीत स्वातंत्र्यपूर्व कालखंडा पासून सुरू झालेला वृत्तपत्रांचा हा समाज प्रबोधनाचा वारसा सातत्याने सुरू आहे. वृत्तपत्र आणि पत्रकार ही समाजाला डोळस करणारी समाजाची बल स्थाने आहेत. जनतेच्या न्याय हक्कासाठी व राष्ट्रा च्या उत्साहानासाठी वृत्तपत्र आणि पत्रकार हे निर्णायक भूमिका घेणारे घटक आहेत. न्यायाच्या बाजूने त्यांची लेखणी सतत जनतेचे नेतृत्व करीत असते. सत्याच्या बाजूने उभे राहण्याचा व लढा देण्याचा इतिहास हा आपल्या वृत्तपत्रांचा इतिहासिक वारसा आहे. तो जपला जावा. या प्रसंगी प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. प्राचार्य कोल्हे यांनी परिसरातील सर्व पत्रकार मित्रांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पत्रकार याकूब पिंजारी व खुशाल पाटील यांचा राज्यशास्त्र विभाग मार्फत सन्मान करण्यात आला. या वेळी प्रा. डॉ. सुनील नेवे यांच्या वतीने उपस्थित पत्रकारांना शैक्षणिक भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. मुकेश चौधरी व राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन प्रा. सुनील नेवे यांनी केले.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, यावल